मुंबई : दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि पोलिस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा करत विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त केला. ते म्हणाले, “काल दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आणि लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर, त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी ‘वंचित बहुजन आघाडी’ने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.”
या बंदच्या आवाहनानंतर राज्यातील विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांची भूमिका काय राहणार, याकडे लक्ष लागले आहे.
