पिंपरी(pimpri chinchwad)– शहरात नोकरी, फ्लॅट आणि गावाकडे शेतीच्या अटी; पस्तीशी ओलांडली तरी अनेक जण अविवाहित
“मुलीचे लग्न कसे करायचे?” हा प्रश्न आता बदलत्या काळात “मुलाचे लग्न कसे जमवायचे?” असा झाला आहे. पिंपरी-चिंचवड आणि परिसरात वाढत्या अपेक्षा, आर्थिक निकष आणि सामाजिक बदलांमुळे अनेक तरुणांचे विवाह रखडत असून ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
औद्योगिक आणि आयटी क्षेत्राच्या वाढीसोबत शहरातील विवाहसंस्कृतीत मोठा बदल झाला आहे. वधूपक्षाकडून आता केवळ मुलाचा स्वभाव किंवा कुटुंब पाहिले जात नसून त्याची नोकरी, पगार, स्थावर मालमत्ता आणि भविष्यातील आर्थिक स्थैर्य यालाच प्राधान्य दिले जात आहे. परिणामी, शेती करणारे किंवा लहान व्यवसाय करणारे तरुण या स्पर्धेत मागे पडत आहेत.
उच्चशिक्षण आणि करिअरच्या धावपळीत अनेक तरुणांचे वय ३० च्या पुढे गेले आहे. चांगल्या पगाराची नोकरी किंवा स्थिर व्यवसाय उभा करताना लग्नाचा विषय मागे पडतो. मात्र नंतर स्थळ शोधताना अपेक्षांचा डोंगर समोर उभा राहतो. आयटी क्षेत्रात नोकरी करणारे किंवा सरकारी सेवेत असलेले तरुण सहज पसंतीस पडतात, तर ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्यांना नकाराचा सामना करावा लागतो.
सध्या वधूपक्षाकडून ठेवण्यात येणाऱ्या अटींमुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. पुणे-मुंबईसारख्या शहरात नोकरी असावी, स्वतःच्या नावावर फ्लॅट असावा आणि त्याचवेळी गावाकडे शेती व घरही असावे, अशा तिहेरी अपेक्षा अनेक ठिकाणी व्यक्त केल्या जात आहेत. या अटी पूर्ण करणे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी कठीण ठरत आहे.
या परिस्थितीचा फायदा घेत लग्न जुळवणाऱ्या दलाल आणि मॅरेज ब्युरोंची संख्या वाढली आहे. स्थळ दाखवण्यासाठीच पैसे घेणे, लग्न ठरल्यावर मोठी रक्कम मागणे असे प्रकार घडत आहेत. काही ठिकाणी फसवणुकीच्या घटनाही पुढे येत असल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे.
पिंपरी-चिंचवड लगतच्या मावळ आणि ग्रामीण भागात शेती करणाऱ्या तरुणांसाठी ही समस्या अधिक तीव्र आहे. “शेतकरी नवरा नको ग बाय” या मानसिकतेमुळे अनेक सुशिक्षित आणि कष्टाळू तरुण विवाहापासून वंचित राहत आहेत. यामुळे सामाजिक समतोल बिघडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, मुलींचे शिक्षण आणि स्वावलंबन वाढणे हे सकारात्मक असले तरी अपेक्षांचा अतिरेक टाळणे गरजेचे आहे. विवाह हा केवळ आर्थिक व्यवहार न राहता समजुती, संस्कार आणि कुटुंबव्यवस्थेचा भाग राहावा, यासाठी समाजाने विचार करण्याची वेळ आली आहे.
एकीकडे करिअरच्या स्पर्धेत पुढे जाण्याची धडपड आणि दुसरीकडे विवाहासाठी वाढत्या अटींचा दबाव यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील अनेक तरुण अडकले असून, या प्रश्नावर सामाजिक स्तरावर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
