Pimpri-Chinchwad-स्वच्छतेचा संकल्प; १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक प्रभागात ‘शून्य कचरा झोपडपट्टी’! मोशी दुर्घटनेनंतर महापालिकेचा मोठा निर्णय; गवळीमाथा-फुगेवाडी मॉडेल आता शहरभर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशींचे स्पष्ट आदेश
पिंपरी-चिंचवड :
मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील दुर्घटनेनंतर कचरा व्यवस्थापन अधिक सुरक्षित, शाश्वत आणि प्रभावी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील किमान एका झोपडपट्टीत १५ ऑगस्टपूर्वी ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. गवळीमाथा आणि फुगेवाडी (दापोडी) येथे यशस्वी ठरलेल्या मॉडेलची आता संपूर्ण शहरात अंमलबजावणी होणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक घरातून कचऱ्याचे उगमस्थानी वर्गीकरण, ओला व सुका कचरा स्वतंत्र संकलन, घरगुती कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, परिसराची नियमित स्वच्छता आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती यावर विशेष भर दिला जाणार आहे. महिला बचत गट, स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
मोशी दुर्घटनेनंतर शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक विकेंद्रित करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. मोठ्या प्रमाणावर कचरा एकाच ठिकाणी साठविण्याऐवजी प्रत्येक परिसरातच कचऱ्याचे वर्गीकरण आणि व्यवस्थापन करण्याची संकल्पना या प्रकल्पातून प्रत्यक्षात आणली जाणार आहे. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी होईल, वाहतुकीवरील ताण घटेल आणि पर्यावरणीय धोकेही कमी होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम तसेच उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांना प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने तातडीने योग्य झोपडपट्टीची निवड करून नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. गवळीमाथा आणि फुगेवाडी येथील यशस्वी प्रकल्पाचा अभ्यास करून त्याच धर्तीवर काम करण्यासही सांगितले आहे.
महापालिकेच्या या उपक्रमामुळे झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छतेची नवी संस्कृती रुजेल, नागरिकांचा सहभाग वाढेल आणि ‘स्वच्छ, निरोगी व पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड’ घडविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. १५ ऑगस्टपर्यंत शहरातील प्रत्येक प्रभागात ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ उभी करण्याचे लक्ष्य आता महापालिकेसमोर आहे.