हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात आज सकाळी 3.5 रिश्टर स्केलचा सौम्य भूकंप जाणवला. पांगरा शिंदे परिसरासह आसपासच्या गावांमध्ये हा धक्का स्पष्टपणे जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
प्राथमिक माहितीनुसार, जमिनीखालील हालचालीमुळे काही सेकंदांसाठी कंपने जाणवली. अचानक जाणवलेल्या या धक्क्यामुळे अनेक नागरिक घराबाहेर मोकळ्या जागेत धावले. सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. काही ठिकाणी किरकोळ तडे गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, मात्र अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून वसमत परिसरात सौम्य भूकंपाचे धक्के वारंवार जाणवत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढत आहे.
