पिंपरी-चिंचवड ः
घरगुती वादातून निर्माण झालेला तणाव अखेर एका ३४ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतला आहे. मावळ तालुक्यातील कातवी येथील ‘व्हीटीपी अर्बन लाईफ’ (VTP Urban Life) सोसायटीमध्ये एका महिलेने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (दि. ९ मे) दुपारी घडली. नागरिकांनी डोळ्यादेखत महिलेला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. प्रतिभा मनीष शंकर (वय ३४, रा. व्हीटीपी अर्बन लाईफ सोसायटी, कातवी, मावळ) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास प्रतिभा या त्यांच्या आठव्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीत लटकलेल्या अवस्थेत सोसायटीमधील नागरिकांना दिसल्या. त्यांना पाहून परिसरात एकच गोंधळ उडाला. बाल्कनीला लटकलेल्या असताना त्या खाली उभ्या असलेल्या लोकांशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. काही जागरूक नागरिकांनी तातडीने त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली आणि गॅलरीतून त्यांना हात देऊन वर खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने प्रतिभा यांचा हात निसटला आणि त्या थेट आठव्या मजल्यावरून खाली कोसळल्या. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
आत्महत्येचे प्राथमिक कारण
घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून प्रतिभा यांचा घरात वाद सुरू होता. याच घरगुती वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांची भूमिका:
“या प्रकरणी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घरगुती वादाच्या कारणावरून ही आत्महत्या झाल्याचे प्राथमिक तपासात दिसत असून, सर्व बाजूंनी अधिक तपास सुरू आहे.” – तळेगाव एमआयडीसी पोलीस.
सदर घटनेमुळे कातवी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कौटुंबिक वादातून होणाऱ्या अशा घटनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.
