कोकणातील हापूसचा हंगाम संपत आला; गोवा, धारवाड, बेळगावच्या आंब्यांनी व्यापले मार्केट
पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठेत आता आंब्याचा रंग पूर्णपणे बदलताना दिसत आहे. कोकणातील अस्सल हापूस आंब्याची आवक कमी होत असतानाच, दक्षिण भारतातून येणाऱ्या स्वस्त आंब्यांनी शहरातील मार्केट व्यापले आहे. दिसायला हापूससारखेच असणारे हे आंबे कमी दरात उपलब्ध असल्याने ग्राहकांचा कल त्यांच्याकडे वाढू लागला आहे. मात्र, याच संधीचा फायदा घेत काही विक्रेते स्वस्त आंबा ‘कोकणी हापूस’ म्हणून विकत असल्याची चर्चा बाजारात रंगू लागली आहे.
फेब्रुवारीपासून शहरातील पिंपरी, भोसरी, चिंचवड आणि आकुर्डी बाजारपेठेत कोकणातील हापूसची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली होती. सुरुवातीच्या काळात आंब्याचे दर चांगलेच तेजीत होते. एका पेटीसाठी १८०० ते २००० रुपये मोजावे लागत होते. मात्र, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर चित्र बदलले. ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे बाजारातील मागणी घटली. परिणामी हापूसचे दर घसरले.
सध्या शहरातील बाजारात अस्सल कोकणी हापूस २०० ते २५० रुपये किलो दराने विकला जात आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधून येणाऱ्या आंब्याची आवक आता कमी झाली आहे. त्याचवेळी गोवा, बेळगाव, खानापूर, धारवाड आणि केरळ भागातून येणाऱ्या आंब्यांची बाजारात मोठी एन्ट्री झाली आहे.
हे आंबे दिसायला जवळपास हापूससारखेच असल्याने सामान्य ग्राहकांची दिशाभूल होत आहे. मूळतः १०० ते १२५ रुपये किलो दराने उपलब्ध असणारा हा आंबा काही ठिकाणी ‘हापूस’ म्हणून २५० ते ३०० रुपये किलो दराने विकला जात असल्याचे समोर येत आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, यंदा सर्वसामान्य ग्राहक स्वस्त आणि चांगल्या चवीचा पर्याय शोधत आहेत. त्यामुळे दाक्षिणात्य आंब्यांची मागणी वाढली आहे. मात्र, खरेदी करताना ग्राहकांनी आंब्याची जात, सुगंध आणि उत्पत्तीची माहिती तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
