​अधिक मासाचा गोडवा! पिंपरी-चिंचवडमध्ये ‘रेडीमेड’ अनारसे आणि बत्ताशांना मोठी मागणी

महागाई असूनही बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी; ‘होममेड’ उत्पादनांना गृहिणींची पसंती

​पिंपरी-चिंचवड :
पुरुषोत्तम मास अर्थात अधिक महिना सुरू झाला आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात धार्मिक उत्सवाचे वातावरण आहे. दानधर्म आणि पारंपरिक वाण देण्याच्या प्रथेला उधाण आले आहे. विशेषतः जावयाला वाण देण्याची परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने पाळली जात आहे. यंदा शहरातील बाजारपेठांमध्ये जाळीदार अनारसे आणि गोड बत्ताशांच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

​३३ आकड्याचे धार्मिक महत्त्व
​हिंदू परंपरेनुसार अधिक मासात ३३ कोटी देवतांचे स्मरण केले जाते. त्याचे प्रतीक म्हणून ३३ बत्तासे आणि ३३ अनारसे दान करण्याची प्रथा आहे. अधिक मासात जावई, आई, बहीण आणि भाच्याला वाण दिले जाते. या वाणामध्ये अनारसे आणि बत्ताशांना विशेष महत्त्व आहे. दर तीन वर्षांनी हा महिना येतो. पुण्यप्राप्तीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात दानधर्म करत आहेत. पूर्वी वाणासाठी भांडी किंवा इतर वस्तू दिल्या जायच्या. मात्र, आता वाढती महागाई आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनारसे व बत्ताशांचे दान करण्याकडे कल वाढला आहे.

​’रेडीमेड’ आणि ‘होममेड’ अनारशांना पसंती
​पूर्वी महिला घरीच अनारसे तयार करायच्या. मात्र, आता बदलत्या काळानुसार ‘रेडीमेड’ अनारसे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. पिंपरी-चिंचवडच्या बाजारात सध्या ५०० ते ८०० रुपये किलो दराने अनारसे उपलब्ध आहेत. त्यांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. शहरातील अनेक महिलांनी घरगुती व्यवसायाच्या माध्यमातून अनारसे तयार केले आहेत. या घरगुती व्यवसायामुळे महिलांना मोठा आर्थिक हातभार लागत आहे.

​बत्ताशांच्या दरात किलोमागे ४० रुपयांची वाढ
​साखर आणि इंधनाच्या दरवाढीचा थेट फटका यंदा बत्ताशांना बसला आहे. गेल्या वर्षी १२० ते १५० रुपये किलो मिळणारे बत्तासे यंदा १६० ते २०० रुपये किलो झाले आहेत. बाजारात पांढऱ्या बत्ताशांसोबतच रंगीत बत्ताशांना मोठी मागणी आहे. रंगीत बत्ताशांची किंमत साध्या बत्ताशांपेक्षा दहा रुपयांनी जास्त आहे. महागाई असली तरी परंपरेसाठी नागरिक खरेदी करत आहेत.

​अनारशाच्या जाळीत ‘देवतांचा वास’
​अनारसे तयार करताना त्यावर पडणारी जाळी अत्यंत शुभ मानली जाते. भाविकांच्या श्रद्धेनुसार, अनारशाच्या प्रत्येक छिद्रात देवतांचा वास असतो. जितकी जाळी आकर्षक, तितका अनारसा अधिक पवित्र मानला जातो. या धार्मिक भावनेमुळे बाजारात आकर्षक जाळीदार अनारशांची मागणी वाढली आहे.

​उत्पन्नाचे चांगले साधन
अधिक मासात अनारशांना विशेष धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे दरवर्षी मागणी वाढते. यंदा ग्राहकांकडून जाळीदार आणि घरगुती अनारशांना अधिक पसंती मिळत आहे. महिलांसाठी हा व्यवसाय उत्पन्नाचे चांगले साधन ठरला आहे. यंदा विक्रीत मोठी वाढ झाली आहे.

​खरेदी करणे सोयीचे
कुटुंबात वाण देण्याची परंपरा अनेक वर्षांपासून आहे. यंदा बाजारात सुंदर जाळीदार अनारसे सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे वेळेची बचत झाली आणि खरेदी करणे सोयीचे झाले. घरगुती चवीचे अनारसे ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *