पिंपरी, २३ मे : एकीकडे विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता, दुसरीकडे पावसाळ्याची चाहूल आणि त्यातच नागरिकांची रोजची होणारी वाहतूक कोंडी… या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार शंकर जगताप यांनी जनसेवेचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. पिंपळे निलख येथील रक्षक चौकातील उड्डाणपूल कोणताही गाजावाजा, उद्घाटन सोहळा किंवा राजकीय श्रेयवादाच्या अडथळ्यांशिवाय तत्काळ खुला करण्याचा निर्णय आमदार शंकर जगताप यांनी घेतला आणि नागरिकांना मोठा दिलासा दिला.
या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊनही तांत्रिक प्रक्रिया आणि उद्घाटनाच्या तारखांमुळे तो वाहतुकीसाठी बंद होता. यामुळे या परिसरात रोजच प्रचंड वाहतूक कोंडी होत असे. नागरिकांचे होणारे हाल पाहून आमदार शंकर जगताप यांनी प्रशासनाकडे तातडीने पाठपुरावा केला. विशेष म्हणजे, आचारसंहितेचा काळ असतानाही केवळ जनहित आणि ‘गुड गव्हर्नन्स’ या सूत्राचा आधार घेत, त्यांनी अधिकृत सोपस्कारांपेक्षा नागरिकांची सोय महत्त्वाची मानली.
याबाबत बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले, “आमचे सरकार हे सर्वसामान्यांच्या सोयीसाठी कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गुड गव्हर्नन्स’च्या समीकरणावर आम्ही काम करत आहोत. लोकांची सेवा हेच आमचे अंतिम ध्येय आहे. सोहळ्यांच्या मागे न लागता थेट जनतेच्या समस्या निवारण करणे हीच लोकशाहीतील खरी
लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे.”
……
नागरिकांना मोठा दिलासा
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची स्थिती आणि भुयारी मार्गाच्या कामामुळे वाहतुकीवर येणारा ताण लक्षात घेता, हा उड्डाणपूल खुला होणे अत्यंत गरजेचे होते. आता या पुलामुळे औंध ते सांगवी फाटा आणि रावेत ते किवळे या मार्गांवरील प्रवास वेगवान आणि सिग्नलमुक्त होणार आहे.
…….
”सोहळे आणि उद्घाटनाच्या पलीकडे जाऊन नागरिकांची सेवा करणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गुड गव्हर्नन्स’च्या समीकरणावर आमची वाटचाल सुरू असून, लोकांची गैरसोय टाळण्यासाठी कोणताही गाजावाजा न करता हा उड्डाणपूल तत्काळ खुला करण्याची सुचना पिंपरी महापालिका प्रशासनाला केली होती त्यावर प्रशासनाने तात्काळ अंमलबजावणी केली आहे.
शंकर जगताप
आमदार,चिंचवड विधानसभा
