२६ मे.पूर्वीच केरळमध्ये मान्सूनची एन्ट्री? हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : देशभरात वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झाले असतानाच भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे. नैऋत्य मान्सून यंदा नेहमीपेक्षा लवकर दाखल होण्याची शक्यता असून, २६ मेपर्यंत तो केरळ किनारपट्टीवर पोहोचू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

साधारणपणे १ जूनच्या आसपास केरळमध्ये मान्सून दाखल होतो. मात्र, यंदा वातावरणीय परिस्थिती अनुकूल असल्याने मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. अंदमान-निकोबार बेटांसह दक्षिण बंगालच्या उपसागरातही मान्सून पुढे सरकत असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, मान्सून लवकर दाखल होणार असला तरी यंदा पावसाचे एकूण प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे ९२ टक्के पाऊस होण्याचा अंदाज असून, एल निनोच्या प्रभावामुळे जुलैनंतर पावसाचा जोर कमी होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

देशातील शेती, जलसाठे आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी मान्सून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाकडे शेतकरी आणि सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. हवामान खात्याकडून पुढील काही दिवसांत अधिक सविस्तर अंदाज जाहीर केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *