फर्निचर मॉल मालकावर ५ राऊंड फायरिंग; हरिद्वारमधून आरोपींना अटक, मूसेवाला हत्याकांडातील आरोपीचा कट उघड
पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या पुनावळे येथील ‘ए.जे. फर्निचर मॉल’ गोळीबार प्रकरणाचा पोलीसांनी अखेर पर्दाफाश केला आहे. खंडणीसाठी बिष्णोई गँगने हा हल्ला घडवून आणल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील तीन आंतरराज्यीय शार्पशूटरना उत्तराखंडमधील हरिद्वार येथून अटक केली आहे. विशेष म्हणजे, पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी कुलदीप उर्फ कशिष यानेच या कटाची सूत्रे हलवल्याचे उघड झाले आहे.
गुंडा विरोधी पथक आणि गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. न्यायालयाने तिन्ही आरोपींना २८ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासादरम्यान पोलीसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली. आरोपींमध्ये संपर्कासाठी ‘सिग्नल’ या गुप्त मेसेजिंग ॲपचा वापर करण्यात आला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपींना जाळ्यात ओढण्यात आले. सर्वप्रथम आरोपी परवीन याच्याशी ‘इन्स्टाग्राम’वर संपर्क करण्यात आला. त्यानंतर त्याला ‘सिग्नल’ ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. याच ॲपवरून सुपारीची डील ठरल्याची माहिती समोर आली आहे.
फर्निचर व्यवसायिकावर हल्ला करण्यासाठी अडीच लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. बिष्णोई टोळीचा सदस्य आरजु बिष्णोई याने आरोपींना पिस्तूल, जिवंत काडतुसे, वाहने आणि रोख रक्कम उपलब्ध करून दिली होती.
गुन्हा करण्यापूर्वी आरोपींना चंदिगढ येथे नेण्यात आले. तेथे त्यांना पिस्तूल चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आरोपी खासगी ट्रॅव्हल्सने पुण्यात दाखल झाले. त्यांनी काही दिवस शहरात मुक्काम करत परिसराची रेकी केली. त्यानंतर गोळीबाराचा कट राबवण्यात आला.
१५ मे रोजी रात्री नऊच्या सुमारास पुनावळे येथील ‘ए.जे. फर्निचर’ मॉलसमोर हा थरार घडला. मॉलचे मालक जगदीश भेराराम बिष्णोई हे बाहेर बसले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी त्यांच्यावर जवळून ५ ते ६ राऊंड गोळीबार केला. सुदैवाने ते या हल्ल्यातून बचावले.
या घटनेपूर्वी जगदीश बिष्णोई आणि त्यांचे भागीदार अशोक कुमार बिष्णोई यांना परदेशी क्रमांकावरून धमकीचे कॉल आले होते. दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी धमकीकडे दुर्लक्ष केल्यानेच हा हल्ला झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तालयाने सात स्वतंत्र पथके तयार केली होती. तपासासाठी तब्बल ३५० ते ४०० सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. संशयित लॉजची तपासणी करण्यात आली. एका लॉजमधील नोंदीवरून आरोपींची ओळख पटली.
तांत्रिक विश्लेषणातून आरोपी हरियाणातील असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीस पथक रोहतक येथे दाखल झाले. सलग चार दिवस आरोपींचा शोध घेण्यात आला. दरम्यान आरोपी हरिद्वारला पळाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीसांनी हरिद्वारमध्ये सापळा रचून तिन्ही आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये परवीन रामनिवास (वय २२, रा. झज्जर, हरियाणा), पंकज कुलदीप (वय २१, रा. रोहतक, हरियाणा) आणि सागर अजयपाल (वय २१, रा. सोनेपत, हरियाणा) यांचा समावेश आहे.
दरम्यान, बिष्णोई टोळीचे शहरातील जाळे अधिक सक्रिय असल्याची माहितीही तपासातून पुढे आली आहे. शहरातील काही व्यावसायिकांना यापूर्वीही धमक्या देण्यात आल्याची माहिती पोलीस तपासत आहेत. ‘गोल्डमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सनी वाघचौरे यालाही टोळीने धमकी दिल्याचे समोर आले आहे. तसेच दिघी परिसरातील फर्निचर व्यावसायिकांनाही अशाच प्रकारे धमकावण्यात आल्याची माहिती आहे.
या कारवाईत पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, उपायुक्त शिवाजी पवार, गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या हरीश माने यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि रावेत पोलीसांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
