महिन्याला ४० हजारांची ऑफर धुडकावली; आज कुंकू पुसलं, संसार उद्ध्वस्त झाला; फुगेवाडीतील सारिका राठोड यांचा संघर्ष डोळे पाणावणारा
पिंपरी–चिंचवड
दोन महिन्यांपूर्वी घरात एक चर्चा झाली होती. समोर महिन्याला ४० हजार रुपयांची कमाई, राहण्यासाठी घर आणि आर्थिक स्थैर्याचं स्वप्न होतं. पण त्या स्वप्नामागे होता बेकायदेशीर दारूचा धंदा. तेव्हा पत्नी सारिका राठोड यांनी पती विजय यांच्या डोळ्यांत डोळे घालून एकच वाक्य सांगितलं होतं – “आपल्याला चुकीच्या पैशांची श्रीमंती नको… कष्टाची भाकरी खाऊ, पण दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून मिळवलेला पैसा घरात आणू नका.”
विजय यांनी पत्नीच्या शब्दांचा मान राखला. त्यांनी मोहाला नकार दिला. पण नियतीचा क्रूर खेळ असा की, ज्या विषारी दारूच्या धंद्याला त्यांनी तुच्छ मानलं, त्याच विषारी दारूने अखेर त्यांचा जीव घेतला.
आज सारिका राठोड यांच्या कपाळावरील कुंकू पुसलं आहे. घरातील कर्ता पुरुष गेला आहे. या दुर्घटनेत विजय यांच्यासोबत त्यांच्या भावाचाही मृत्यू झाला. तर वृद्ध सासरे मृत्यूशी झुंज देत रुग्णालयात उपचार घेत आहेत. घरात एकाच वेळी तीन-तीन संकटं कोसळली आहेत.
एका बाजूला पतीचा विरह, दुसऱ्या बाजूला आजारी सासूबाईंची जबाबदारी आणि तिसऱ्या बाजूला उद्याच्या उदरनिर्वाहाची चिंता. टीबी, ब्रेन ट्युमर आणि इतर गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या सासूबाईंचा औषधांचा खर्च कसा भागवायचा, घरभाडे कसं भरायचं, उद्या चूल कशी पेटवायची, या प्रश्नांनी सारिका यांची झोप उडाली आहे.
या सगळ्या संकटातही सारिका यांचा स्वाभिमान मात्र ढळलेला नाही. डोळ्यांत अश्रू आहेत, पण हात पसरलेले नाहीत. “आम्हाला मदतीचे पैसे नकोत. आमच्या हाताला काम द्या. आम्ही कष्ट करू, पण जगू सन्मानाने,” अशी त्यांची विनंती आहे.
फुगेवाडीतील विषारी दारूच्या या दुर्घटनेने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त केली. पण सारिका राठोड यांची कहाणी या सगळ्यात वेगळी ठरते. कारण त्यांनी गरिबी स्वीकारली, पण चुकीचा पैसा स्वीकारला नाही. त्यांनी तत्त्वांची साथ सोडली नाही. आज त्याच तत्त्वांच्या मोबदल्यात त्यांना आयुष्यभराचं दुःख मिळालं आहे.
विजय राठोड यांच्या मृत्यूने केवळ एका व्यक्तीचा जीव गेलेला नाही, तर प्रामाणिकपणावर विश्वास ठेवणाऱ्या एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. घरात आज शांतता आहे, भिंतींवर आठवणी आहेत आणि डोळ्यांत एकच प्रश्न आहे – “चुकीचा मार्ग नाकारण्याची हीच का शिक्षा?”
फुगेवाडीतील या छोट्याशा घरातून आजही एक आवाज बाहेर पडतोय – मदतीचा नाही, तर जगण्याची संधी मागणारा. आणि कदाचित हीच त्या कुटुंबाची सर्वात मोठी ताकद आहे.
