गेल्या काही दिवसांपासून उकाडा आणि दमट वातावरणामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर रविवारी पहाटे दिलासा मिळाला. मुंबईसह उपनगरांमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला. पावसाच्या जोरदार सरींमुळे अनेक भागांत रस्ते ओलेचिंब झाले असून नागरिकांनीही या पावसाचे स्वागत केले.
पहाटेपासून अंधेरी, गोरेगाव, मालाड, बोरिवली, दादर, परळ, कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, वांद्रे तसेच दक्षिण मुंबईतील विविध भागांत जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांनीही हजेरी लावली. त्यामुळे सकाळच्या वेळेत वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पुढील २४ तासांत मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पुढील २४ तासांत मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.
पावसामुळे तापमानात काही अंशांनी घट झाली असून गेल्या अनेक दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनीही गारव्याचा आनंद घेतला. दुसरीकडे, काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या किरकोळ घटना समोर आल्या आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण किनारपट्टीसह मुंबई महानगर क्षेत्रात पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या या सरी आगामी मान्सूनच्या आगमनाची चाहूल मानल्या जात आहेत. यंदा मान्सून महाराष्ट्रात वेळेत दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाने नागरिकांना विजांच्या कडकडाटावेळी उघड्या जागेत न थांबण्याचा, तसेच आवश्यक नसल्यास घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, पावसामुळे मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी आगामी काही दिवस हवामानातील बदलांमुळे सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
