अवैध दारूच्या साखळीचा छडा लावण्याची मागणी
पिंपरी-चिंचवड :
फुगेवाडी आणि दापोडी परिसरातील विषारी दारू प्रकरणात झालेल्या मृत्यूंसाठी केवळ आरोपीच नव्हे, तर तक्रारींकडे दुर्लक्ष करणारी यंत्रणाही तितकीच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला. रविवारी त्यांनी फुगेवाडीतील पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
“स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी सातत्याने अवैध दारूविक्रीबाबत इशारा देत होते. मात्र त्या तक्रारींना गांभीर्याने घेतले गेले नाही. वेळेत कारवाई झाली असती तर अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला नसता,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
त्यांनी सांगितले की, फुगेवाडी-दापोडी परिसरातील अवैध दारूविक्रीबाबत शिवसेनेचे निलेश हाके यांनी अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. खासदार श्रीरंग बारणे यांनीही हा मुद्दा सातत्याने मांडला होता. तरीही संबंधित यंत्रणा प्रभावी कारवाई करण्यात अपयशी ठरली. त्यामुळे आज अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
विषारी दारूचा प्रश्न हा केवळ पिंपरी-चिंचवडपुरता मर्यादित नसल्याचेही त्यांनी नमूद केले. देशभरात अशा घटना घडत आहेत. विषारी दारूमध्ये वापरले जाणारे मिथेनॉलसारखे घातक रसायन नेमके कोणाकडून आणि कसे उपलब्ध होते, याचा सखोल तपास होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण पुरवठा साखळीवर उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीसांनी सातत्याने लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक नागरिकांकडून अनेकदा अवैध धंद्यांविरोधात तक्रारी दिल्या जातात. मात्र त्यांची दखल घेतली जात नाही. परिणामी अशा दुर्घटना घडतात, असेही त्या म्हणाल्या. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
पीडित कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही डॉ. गोऱ्हे यांनी दिले. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. फुगेवाडीतील मृत्यूंच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले असून या प्रकरणामुळे अवैध दारूविरोधातील यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
