जळगाव
सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातलेला कॉक्रोच जनता पार्टीचे निर्माते अभिजीत दिपके उद्या ६ जून रोजी भारतात पोहोचत आहेत. अभिजित दिपके यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारशी बोलावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
खडसे आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत की, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे #NEET ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. त्या विरोधात अभिजीत यांनी देशातील तरुणांना एकत्र करत एक चळवळ उभी केली आहे. पण काही अंधभक्तांना ते रुचलेले दिसत नाही म्हणून अभिजित यांना मागे धमक्या देण्यात आल्या आहेत. अभिजित हे महाराष्ट्राचे नागरिक आहे, शिवाय लोकशाहीने त्यांना लढा उभारण्याचा अधिकार दिला आहे. उद्या अभिजित भारतात येत असताना त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात विशेष लक्ष घालून अभिजित यांना योग्य ती सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारशी बोलावे असं त्या म्हणाल्या
