(mumbai)-तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वयंरोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २५ हजार रुपयांपासून ते २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य*
तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वयंरोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तृतीयपंथीयांच्या स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेद्वारे २५ हजार रुपयांपासून ते २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या योजनेचा उद्देश तृतीयपंथीयांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे, आर्थिक स्वावलंबन प्राप्त करून देणे, कौशल्य विकासाला चालना देणे तसेच सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. यासोबतच सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणालाही या योजनेमुळे बळ मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत तीन प्रकारच्या कर्ज योजनांचा समावेश करण्यात आला आहे. लघु कर्ज योजनेत २५ हजार रुपयांपर्यंत, मध्यम कर्ज योजनेत ५० हजार रुपयांपर्यंत तर दीर्घ कर्ज योजनेत २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. प्रत्येक योजनेत लाभार्थ्याचा हिस्सा पाच टक्के, शासन अनुदान ४५ टक्के आणि बँक कर्ज ५० टक्के या प्रमाणात निधीची रचना करण्यात आली आहे. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना तीन टक्के व्याज सवलतीचाही विशेष लाभ मिळणार आहे.
ही योजना सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर कार्यालयामार्फत राबविण्यात येत असून अधिक माहितीसाठी तालुका समन्वयक व्यंकटी तोगरे यांच्याशी सहायक आयुक्त समाज कल्याण, मुंबई शहर, प्रशासकीय इमारत भाग-१, चौथा मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई-४०००७१ येथे किंवा मोबाईल क्रमांक ८२९१७८८७५७ वर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहरचे समाज कल्याण सहायक आयुक्त यांनी
केले आहे.
