पिंपरी : (Pimpri Chinchwad)आज १९ मार्च… हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, मांगल्याचा गुढीपाडवा! संपूर्ण शहर पहाटेपासून विजयाची गुढी उभारत असताना, चिंचवड, वाकड आणि म्हाळुंगे येथील तीन घरांमध्ये मात्र काळजाचा थरकाप उडवणारा आक्रोश घुमत होता. नियतीचा क्रूर खेळ असा की, ज्या दिवशी मुलांनी घरी येऊन गुढी उभा राहायची होती, त्याच दिवशी त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्याची दुर्दैवी वेळ आई-वडिलांवर आली.
लेह-लडाख जिंकलं, पण मृत्यूने घात केला!
कुणाल चोरडिया, सिद्धांत आल्हाट आणि मयुरेश पाडाळे… हे तीन जिवाभावाचे मित्र लेह-लडाखच्या साहसी सहलीवरून परतत होते. पण राजस्थानातील कोटा येथे झालेल्या भीषण अपघाताने या प्रवासाचा अंत स्मशानभूमीत केला.
अंत्यसंस्कारावेळी उसळला दुःखाचा महापूर:
आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जिथे दारासमोर रांगोळी आणि तोरणं असायला हवी होती, तिथे आज रुग्णवाहिका उभी होती.
कुणाल (चिंचवड), सिद्धांत (वाकड) आणि मयुरेश (म्हाळुंगे) या तिघांचे पार्थिव आज विमानाने पुण्यात आणले गेले आणि पाडव्याच्याच दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.
“सण आला, पण आमचं सोनं गेलं…”
“आज पाडवा आहे, मुलं घरी येतील आणि सण साजरा करू,” अशी आस लावून बसलेल्या माता-पित्यांचा टाहो उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकत होता. सणासुदीच्या दिवशी संपूर्ण परिसर आनंदात असताना, या तीन तरुणांच्या मित्रांनी जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या मित्रांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.
मैत्रीचा प्रवास असा संपेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. नियतीने आज एकाच वेळी तीन घरांचे आधारस्तंभ हिरावून नेले आहेत.
ह्या घटने मधून तरी मुलांनी काही तरी शिकावे अशी चर्चा मात्र स्मशान भूमी मध्ये चालू होती
