रासायनिक फवारण्या, रेडिएशन आणि जंगलतोडीचा फटका; सहा तालुक्यांत मधमाश्यांची संख्या घटली
‘परागीकरण’ धोक्यात; फळे, भाजीपाला आणि नगदी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती
पुणे :
शेतीचा अदृश्य आधार मानल्या जाणाऱ्या मधमाश्यांवर मोठे संकट ओढावले आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ आणि मुळशी या तालुक्यांमध्ये मधमाश्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रासायनिक कीटकनाशकांचा वाढता वापर, जंगलतोड, मोबाईल टॉवरचे रेडिएशन आणि बदलते हवामान यामुळे मधमाश्यांच्या वसाहती नष्ट होत आहेत. परिणामी भविष्यात शेती उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आज ‘जागतिक मधमाशी दिना’निमित्त पर्यावरण अभ्यासकांनी याबाबत चिंता व्यक्त केली. मधमाश्या नष्ट होणे म्हणजे अन्नसाखळीच धोक्यात येण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुका हा कांदा, टोमॅटो, बटाटा आणि भाजीपाल्यासाठी ओळखला जातो. शिरूरमध्ये ऊस आणि नगदी पिकांचे क्षेत्र मोठे आहे. मावळ आणि मुळशी भागात भात, फळबागा आणि फुलशेती मोठ्या प्रमाणात घेतली जाते. या सर्व पिकांच्या उत्पादनासाठी परागीकरण अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामध्ये मधमाश्यांची भूमिका निर्णायक मानली जाते.
अभ्यासकांच्या मते, जगातील सुमारे ७५ टक्के अन्नपिके परागीकरणावर अवलंबून आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत रासायनिक फवारण्यांमुळे मधमाश्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे भविष्यात पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
‘या’ कारणांमुळे मधमाश्या धोक्यात
– विषारी कीटकनाशकांचा वाढता वापर
– शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही रसायनांचा थेट परिणाम मधमाश्यांच्या मज्जासंस्थेवर होत आहे. त्यामुळे मधमाश्या दिशा विसरतात. अनेक पोळी ओस पडत आहेत.
मोबाईल टॉवरचे रेडिएशन
मोबाईल टॉवरमधून निर्माण होणाऱ्या चुंबकीय लहरींचाही परिणाम मधमाश्यांवर होत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे त्यांची फुलांचा शोध घेण्याची क्षमता कमी होते.
एकाच पिकांची शेती
सध्या अनेक भागांत एकाच प्रकारची पिके घेतली जात आहेत. त्यामुळे मधमाश्यांना आवश्यक विविध फुलांचा अभाव निर्माण होत आहे.
रोगांचा वाढता प्रादुर्भाव
‘वरोआ माईट्स’ आणि ‘फाऊलबूड’सारख्या रोगांमुळे मधमाश्यांच्या संपूर्ण वसाहती नष्ट होत आहेत. या प्रकाराला ‘कॉलनी कोलॅप्स डिसऑर्डर’ असे म्हटले जाते.
“मधमाश्या संपल्या तर मानवजातीचे संकट वाढेल”
“जर पृथ्वीवरून मधमाश्या नष्ट झाल्या, तर मानवजात फार काळ टिकणार नाही,” असा इशारा महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आयन्स्टाईन यांनी दिल्याचे वारंवार सांगितले जाते. सध्याची परिस्थिती पाहता हा इशारा गांभीर्याने घेण्याची वेळ आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
संवर्धनासाठी उपाययोजना आवश्यक
– सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे
– रासायनिक फवारण्या कमी कराव्यात
– शेताच्या बांधावर फुलझाडे लावावीत
– मधमाशी पालन व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे
– पोळी जाळण्याचे प्रकार थांबवावेत
– ग्रामपातळीवर जनजागृती मोहीम राबवावी
तज्ज्ञांचे मत
“माणसाच्या अज्ञानातून मधमाश्या नष्ट होत आहेत. मधमाशी संवर्धनासाठी ‘मधमाशी साक्षरता अभियान’ राबवणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेती वाढल्यास मधमाश्यांचे संरक्षण होईल.”
“भीतीपोटी अनेकदा मोहोळ जाळले जाते. यात हजारो मधमाश्या मरतात. पर्यावरण संतुलनासाठी मधमाश्या वाचवणे काळाची गरज आहे.”
२० मे हाच दिवस का साजरा होतो?
मधुपालन क्षेत्रातील प्रणेते अँटोन जानसा यांचा जन्म २० मे १७३४ रोजी झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्रसंघाने २०१७ पासून २० मे हा दिवस ‘जागतिक मधमाशी दिन’ म्हणून घोषित केला आहे.
