उन्हाळी पर्यटनाचा आनंद ठरतोय शेवटचा प्रवास; पाण्याचा अंदाज न घेता धाडस करणे पडतेय महागात
पिंपरी-चिंचवड :
उन्हाळ्याची सुटी, कडक उन्हाळा आणि थंडावा मिळवण्यासाठी पाण्याचा वेध… हे चित्र विहीर, खदान, नदी आणि धरण यावर सध्या सर्वत्र दिसत आहे. परंतु, ‘नदी, धरण किंवा तलावावर पोहायला जाताना आणि पोहण्याचा आनंद घेताना आधी स्वतःची काळजी घ्या,’ असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. कारण, याच पाण्याच्या आकर्षापोटी गेलेल्या चिंचवड आणि मावळ परिसरातील अनेकांना मागील काही दिवसांत आपला जीव गमवावा लागला आहे. चिंचवड येथील जलतरण तलावात एका युवकाचा तर मावळच्या निसर्गरम्य धरण-नदी पात्रात पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या लागोपाठच्या दुर्घटनांमुळे सुटीच्या आनंदावर विरजण पडले असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पर्यटनाचा अतिउत्साह ठरतोय काळ!
मावळ तालुक्यातील धरणे, बंधारे आणि निसर्गरम्य परिसर पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. उन्हाळ्यात पाण्याचा साठा पाहण्यासाठी आणि पोहण्यासाठी तरुणाईची पावले इकडे वळतात. मात्र, अनेकदा या पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज येत नाही. नवीन ठिकाणी जाऊन अतिउत्साहाच्या भरात पाण्यात उतरणे थेट मृत्यूला आमंत्रण ठरत आहे. चिंचवडच्या जलतरण तलावातही सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याने एका तरुणाला प्राणाला मुकावे लागले आहे.
पाण्याच्या ठिकाणी जाताना ‘या’ गोष्टी नक्की पाळा:
पाण्याचा अंदाज घ्या: कोणत्याही अनोळखी नदी, तलाव किंवा धरणाच्या पाण्यात उतरू नका.
सेल्फीचा मोह टाळा: पाण्याच्या कडेला, निसरड्या खडकांवर उभे राहून सेल्फी काढणे अत्यंत धोकादायक आहे.
मित्रांसोबत मस्करी नको: पाण्यात असताना एकमेकांना ढकलणे किंवा स्पर्धा लावणे टाळा.
सुरक्षा कवचाचा वापर: पोहताना लाईफ जॅकेट किंवा सुरक्षेचे इतर साहित्य सोबत ठेवा.
पालकांचे नियंत्रण: मुले कुठे जात आहेत, यावर पालकांनी कडक लक्ष ठेवावे. मुलांना एकटे पाठवू नका.
प्रशासनाने तातडीने काय करणे गरजेचे आहे?
इशारा फलक आणि बॅरिकेड्स: मावळ आणि चिंचवडमधील सर्व धोकादायक पर्यटन स्थळांवर ‘पाण्यात उतरण्यास मनाई’ असलेले मोठे फलक तात्काळ लावावेत.
जीवरक्षकांची गस्त: धरणांचे किनार आणि नदीपात्रांजवळ सुटीच्या दिवशी विशेष बचाव पथके आणि जीवरक्षक तैनात करावेत.
स्विमिंग पूलचे ऑडिट: शहरातील खाजगी व सार्वजनिक जलतरण तलावांवर नियमानुसार दर २० लोकांमागे १ जीवरक्षक आहे का, याचे तातडीने ऑडिट व्हावे.
तज्ज्ञांचा थेट सवाल: आनंद घ्यायचा की जीव गमावायचा?
“पाणी हे दुरून सुंदर दिसते, पण त्याचा अंदाज घेणे कठीण असते. तरुण मुले केवळ पोहण्याच्या हौसेपोटी किंवा मित्रांच्या आग्रहाखातर खोल पाण्यात उतरतात. पोहता येत असले तरी धरणातील गाळ आणि थंड पाण्याचा प्रवाह यामुळे हात-पाय आखडतात. त्यामुळे कोणत्याही नवीन ठिकाणी जाताना आधी स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. प्रशासनानेही आता अशा ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे.”
