जार आणि कॉईन वॉटर मशिनमधील पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; अन्न व औषध प्रशासन आणि महापालिकेकडून तपासणीची मागणी
पिंपरी-चिंचवड –
उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात थंड पाण्याची मागणी वाढली असताना पिंपरी-चिंचवड शहरात विक्री होणाऱ्या जार आणि कॉईन वॉटर मशिनमधील पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरभर मोठ्या प्रमाणात थंड पाण्याचा पुरवठा केला जात असला तरी हे पाणी खरोखरच सुरक्षित आणि शुद्ध आहे का, याबाबत नागरिकांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी पाण्याला उग्र वास येत असल्याच्या तक्रारी समोर येत असून या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये लग्नसमारंभ, हॉटेल्स, कार्यालये, औद्योगिक कंपन्या आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जारमधील थंड पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याशिवाय शहरातील अनेक चौक, रस्ते आणि सोसायट्यांबाहेर कॉईन टाकून पाणी मिळणारी यंत्रणा उभारण्यात आली आहे. अवघ्या काही रुपयांत मोठ्या प्रमाणात थंड पाणी उपलब्ध होत असल्याने नागरिकही त्याला पसंती देत आहेत.
मात्र, या पाण्याचा स्रोत, शुद्धीकरण प्रक्रिया आणि गुणवत्तेची तपासणी याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. संबंधित वॉटर प्लांटकडे आवश्यक परवाने आहेत का, पाण्याच्या नमुन्यांची नियमित तपासणी केली जाते का, जारची निर्जंतुकीकरण प्रक्रिया होते का आणि ग्राहकांना दिले जाणारे पाणी सुरक्षित आहे का, याची माहिती अनेक ठिकाणी उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, काही नागरिकांनी पाण्याच्या चवीत आणि वासात बदल जाणवत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे या पाण्याच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वॉटर प्लांट्स आणि कॉईन वॉटर मशिन्सची अन्न व औषध प्रशासन तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाने संयुक्त तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अन्न सुरक्षा नियमांनुसार पिण्याच्या पाण्याची नियमित प्रयोगशाळा तपासणी, स्वच्छता आणि आवश्यक परवानग्या बंधनकारक आहेत. मात्र, प्रत्यक्षात या नियमांचे पालन कितपत केले जाते, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने शहरातील सर्व वॉटर प्लांट्सचे ऑडिट करून नागरिकांसमोर अहवाल जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, तज्ज्ञांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणी पाणी पिताना त्याची चव आणि वास तपासावा. शक्यतो घरातून पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. पाणी संशयास्पद वाटल्यास संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
