नद्यांचा श्वास कोंडला; इंद्रायणी, पवना आणि मुळा प्रदूषणाच्या विळख्यात

सांडपाणी, रासायनिक विसर्ग आणि कचऱ्याचा वाढता मारा; पर्यावरण दिनी नदी संवर्धनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पिंपरी-चिंचवड ः
पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसराच्या पर्यावरणीय समतोलाचा आधार असलेल्या इंद्रायणी, पवना आणि मुळा नद्यांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. एकेकाळी जीवनदायी ठरलेल्या या नद्या आज प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. शहरातून नदीपात्रात मिसळणारे सांडपाणी, औद्योगिक रासायनिक विसर्ग, प्लास्टिक कचरा आणि वाढते अतिक्रमण यामुळे नद्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही नद्यांची बिकट स्थिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
देहू आणि आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रांमुळे इंद्रायणी नदीला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. लाखो वारकरी आणि भाविक वर्षभर या नदीकाठी येतात. मात्र नदीपात्रात साचलेला कचरा, तरंगणारा फेस आणि दुर्गंधी यामुळे नदीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. शहरातून येणारे असंशोधित सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. धार्मिक विधींमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागत नसल्याने प्रदूषण अधिक वाढत आहे. नदीकाठच्या अतिक्रमणामुळे नैसर्गिक प्रवाहालाही अडथळे निर्माण होत आहेत.
शहराची प्रमुख जलवाहिनी असलेली पवना नदीही गंभीर संकटाचा सामना करत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून निर्माण होणाऱ्या लाखो लिटर सांडपाण्याचा भार या नदीवर पडत आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत नाले आणि ड्रेनेज लाईन थेट नदीत जोडल्या गेल्याचे चित्र दिसते. औद्योगिक क्षेत्रातून बाहेर पडणारे रासायनिक पाणीही नदीत मिसळत असल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत. परिणामी नदीतील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मासेमारी व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी जलपर्णीचे साम्राज्य पसरल्याने नदीचा नैसर्गिक प्रवाह बाधित होत आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या सीमेवरून वाहणाऱ्या मुळा नदीलाही नागरीकरणाचा मोठा फटका बसला आहे. शहरातील अनेक नाले थेट नदीत मिसळत असल्याने पाण्याचा दर्जा खालावला आहे. काही ठिकाणी नदीचे पाणी काळवंडलेले दिसते. प्लास्टिक, घनकचरा आणि मैलापाण्यामुळे नदीची जैवविविधता वेगाने नष्ट होत आहे. नदीपात्रात वाढलेल्या जलपर्णीमुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, नदी प्रदूषण हा केवळ स्वच्छतेचा प्रश्न नाही. तो थेट नागरिकांच्या आरोग्याशी, भूजल पातळीशी आणि भविष्यातील जलसुरक्षेशी संबंधित आहे. नद्यांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी पूर्णपणे शुद्ध करूनच विसर्जित केले गेले पाहिजे. अन्यथा आगामी काळात जलसंकट अधिक तीव्र होण्याचा धोका आहे.
नागरिकांनीही प्रशासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे. सर्व सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविणे, नदीत थेट सांडपाणी सोडणारे नाले बंद करणे, अतिक्रमणांवर कारवाई करणे, पाण्याच्या गुणवत्तेचे अहवाल नियमित जाहीर करणे आणि नदी पुनरुज्जीवनासाठी दीर्घकालीन कृती आराखडा राबविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
पर्यावरण दिनानिमित्त शहरात विविध उपक्रम राबविले जात असले तरी प्रत्यक्षात नद्यांचे संवर्धन आणि प्रदूषणमुक्ती यासाठी ठोस कृतीची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अन्यथा पिंपरी-चिंचवडच्या जीवनवाहिन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नद्या भविष्यात केवळ नकाशावरच उरतील, अशी भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *