(pimpri chinchwad)-महावितरणच्या हलगर्जीपणाचा निष्पाप तरुणाला ‘शॉक’!
चर्होलीतील घटना: नौदलात भरती होण्याचे स्वप्न भंगण्याच्या मार्गावर, १७ वर्षीय अनिरुद्ध मृत्यूशी झुंज देतोय
पिंपरी-चिंचवड :
देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून नौदलात जाण्याची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय तरुणाचे आयुष्य महावितरणच्या हलगर्जीपणामुळे अंधारात सापडले आहे. घराच्या गच्चीवर झोपायला गेलेल्या या तरुणाला उच्च दाबाच्या वीजवाहक तारेचा भीषण शॉक बसला. या दुर्घटनेत तो ६५ टक्के भाजला असून सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. महावितरणच्या कथित गलथान कारभारामुळे एका होनहार खेळाडू आणि विद्यार्थ्याचे भविष्य उद्ध्वस्त झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तायक्वांदोपटूचे स्वप्न अधांतरी
अनिरुद्ध प्रशांत पाटील (वय १७, रा. एंजल स्कूलजवळ, चर्होली खुर्द) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनिरुद्ध सध्या बारावीत शिकत आहे. तो एक उत्तम तायक्वांदोपटू असून त्याने खेळात प्राविण्य मिळवले आहे. भारतीय नौदलात (नेव्ही) भरती होऊन देशाची सेवा करायची, त्याचे हेच ध्येय होते. त्यासाठी तो पहाटे उठून रोज मैदानी सराव करायचा. मात्र, एका रात्रीत त्याचे हे स्वप्न कोळसा झाले.
गच्चीजवळून गेलेल्या तारा ठरल्या कर्दनकाळ
अनिरुद्धचे वडील प्रशांत पाटील हे इलेक्ट्रीशियन आहेत. तर आई अर्चना पाटील या एका खासगी संस्थेत अकाऊंटंट आहेत. या कष्टकरी कुटुंबाने २०१८ मध्ये चर्होलीत स्वतःचे छोटे घर बांधले. मात्र, वर्षभरापूर्वी महावितरणने या घरांच्या गच्चीला लागूनच उच्च दाबाच्या वीजवाहक तारा टाकल्या. या तारांमुळे धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती स्थानिक नागरिकांनी आधीच व्यक्त केली होती. परंतु, महावितरणच्या प्रशासनाने या चिंतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
४ मेच्या रात्री घात झाला
नेहमीप्रमाणे ४ मे रोजी रात्री अकराच्या सुमारास अनिरुद्ध घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेला होता. अंधारात त्याचा अंदाज चुकला आणि गच्चीजवळ असलेल्या उच्च विद्युत वाहक तारेला त्याचा स्पर्श झाला. हा विजेचा धक्का इतका प्रचंड होता की, अनिरुद्ध काही फूट दूर फेकला गेला. या भीषण अपघातात त्याचे हात, पाय, पोट आणि पाठ ६५ टक्क्यांपेक्षा जास्त भाजली गेली.
अतिदक्षता विभागात उपचार सुरू
घटनेनंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने भोसरीतील एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, तेथील उपचाराचा खर्च आवाक्याबाहेर असल्याने त्याला पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात हलवण्यात आले. गेल्या ११ दिवसांपासून तो अतिदक्षता विभागात (ICU) जीवन-मृत्यूची लढाई लढत आहे. त्याच्यावर आतापर्यंत अनेक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. अद्यापही त्याचा रक्तस्राव थांबलेला नाही. त्यामुळे त्याची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पाटील कुटुंब आर्थिक संकटात
अनिरुद्धच्या या अपघातामुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उपचाराचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या कठीण परिस्थितीमुळे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे. “महावितरणच्या निष्काळजीपणामुळे माझ्या मुलाची ही अवस्था झाली आहे. त्याच्या उपचाराचा सर्व खर्च महावितरणनेच उचलला पाहिजे,” अशी आर्त हाक त्याची आई अर्चना पाटील यांनी दिली आहे.
महावितरणची चौकशी सुरू; नागरिक संतापले
या गंभीर प्रकरणावर महावितरणकडून केवळ कागदोपत्री हालचाली सुरू आहेत. “या घटनेची समितीमार्फत चौकशी सुरू आहे. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर नियमानुसार आर्थिक मदत दिली जाईल,” अशी माहिती उपकार्यकारी अभियंता राजेंद्र गोरे यांनी दिली. मात्र, घटना घडून दहा दिवस उलटले तरी अद्याप कोणतीही प्रत्यक्ष मदत मिळालेली नाही. त्यामुळे नागरिकांमधून महावितरणच्या कारभारावर प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. निवासी वस्तीत इतक्या जवळून हायव्होल्टेज तारा टाकताना सुरक्षेचे नियम का धाब्यावर बसवले, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
