ई-बसेससाठी राज्यभर चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारा; एसटीचा १०० टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक पर्यावरणपूरक, आधुनिक आणि शाश्वत बनविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्याचे टप्प्याटप्प्याने संपूर्ण विद्युतीकरण करण्यात येणार आहे. ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेअंतर्गत एसटीचा १०० टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी राज्यभर ई-बसेससाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशनचे व्यापक जाळे उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत एसटी महामंडळाच्या आधुनिकीकरणासंदर्भात आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, एसटी महामंडळाचे पदाधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, वाढते प्रदूषण, इंधन खर्च आणि पर्यावरणीय आव्हाने लक्षात घेता सार्वजनिक वाहतुकीचे विद्युतीकरण ही काळाची गरज आहे. राज्य शासनाने ‘विकसित महाराष्ट्र’च्या दृष्टीने हरित आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य दिले असून एसटी महामंडळ या परिवर्तनाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

त्यांनी स्पष्ट केले की, ई-बसेसचा वापर वाढविण्यासाठी केवळ बसेस खरेदी करून चालणार नाही, तर त्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. राज्यातील प्रमुख बसस्थानके, डेपो आणि महत्त्वाच्या मार्गांवर अत्याधुनिक चार्जिंग स्टेशन उभारण्यात यावीत. ग्रामीण आणि दुर्गम भागांनाही या सुविधांचा लाभ मिळेल, यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीत एसटीच्या ताफ्यात नव्या ई-बसेसचा समावेश, चार्जिंग पायाभूत सुविधांचा विस्तार, देखभाल व्यवस्था, तांत्रिक मनुष्यबळाचे प्रशिक्षण आणि ऊर्जा व्यवस्थापन यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील विविध शहरांमध्ये आणि प्रमुख महामार्गांलगत चार्जिंग हब उभारण्याच्या प्रस्तावांचाही आढावा घेण्यात आला.

फडणवीस यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या हरित ऊर्जा धोरणांशी सुसंगत राहून महाराष्ट्राला स्वच्छ आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीत देशात अग्रस्थानी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन एसटी महामंडळाचे रूपांतर आधुनिक, तंत्रज्ञानसक्षम आणि पर्यावरणपूरक संस्थेमध्ये करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.

‘विकसित महाराष्ट्र’च्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असून राज्यातील सार्वजनिक वाहतुकीत हरित क्रांती घडवून आणण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *