शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांचा मोठा घाव; ५ टोळ्यांतील ४५ सराईतांवर मकोकाची कारवाई

आयुक्त विनय कुमार चौबे यांचा संघटित गुन्हेगारीविरोधात निर्णायक बडगा; देहूरोड, काळेवाडी, म्हाळुंगे आणि चिखलीतील टोळ्यांना जबर दणका

पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवड शहरात दहशत माजवून खंडणी, मारामाऱ्या, दरोडे, अंमली पदार्थांची विक्री आणि बेकायदेशीर धंद्यांद्वारे वर्चस्व निर्माण करणाऱ्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर पोलीस आयुक्तालयाने मोठा प्रहार केला आहे. शहरातील पाच सक्रिय टोळ्यांमधील तब्बल ४५ सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

शहरात गेल्या काही महिन्यांपासून काही टोळ्यांकडून दहशत निर्माण करण्याचे प्रकार वाढले होते. जबरी चोरी, खंडणी, शस्त्रांचा धाक, मारामाऱ्या आणि अंमली पदार्थांच्या व्यवहारातून या टोळ्यांनी आपले जाळे मजबूत केले होते. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेने टोळ्यांच्या हालचालींची गोपनीय माहिती संकलित केली. त्यानंतर संबंधित प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्यात आला. मंजुरी मिळताच मकोकाअंतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन कुख्यात टोळ्यांवर सर्वाधिक कारवाई झाली. आफताब समीर शेख याच्या टोळीतील सात जणांवर तर साबीर समीर शेख याच्या टोळीतील तब्बल १७ जणांवर मकोका लागू करण्यात आला. काळेवाडी परिसरातील विकी शंभूसिंग सुतार आणि त्याच्या साथीदारांवरही कारवाई करण्यात आली. म्हाळुंगे परिसरातील सागर बाळू जावळे याच्या टोळीतील सात जणांवर मकोका लावण्यात आला. चिखली परिसरातील अंबादास उर्फ सोन्या राठोड आणि त्याच्या टोळीतील सहा जणांनाही या कारवाईचा फटका बसला आहे.
पोलीसांच्या मते, या टोळ्यांकडून आर्थिक फायद्यासाठी संघटित पद्धतीने गुन्हे केले जात होते. परिसरात दहशत निर्माण करून वर्चस्व राखण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यामुळे कठोर कारवाई अपरिहार्य बनली होती.
ही विशेष मोहीम पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त तेली तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
संघटित गुन्हेगारीला शहरात कोणतीही जागा दिली जाणार नाही. नागरिकांच्या सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही. यापुढेही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असा स्पष्ट संदेश या धडक मोहिमेतून पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *