जनसंवाद सभेत तणावपूर्ण वातावरण; आश्वासनांवर नागरिकांचा विश्वास उडाला, मोर्च्याची तयारी सुरू
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. आता हा प्रश्न थेट राज्याच्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे.
‘ड’ प्रभाग कार्यालयात झालेल्या जनसंवाद सभेत तणाव निर्माण झाला. नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. वातावरण काही काळ तापले होते.
आश्वासनांचा पाऊस, प्रत्यक्षात टंचाई
पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे सचिन लोंढे यांनी नाराजी व्यक्त केली. २०२३ पासून विविध पातळ्यांवर पाठपुरावा सुरू आहे. न्यायालय आणि प्रशासनाकडे धाव घेतली. मात्र प्रत्यक्षात बदल झालेला नाही.
निवडणुकीतील आश्वासनेही विसरली गेल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान सभेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ‘ड’ प्रभागातील बहुतांश लोकप्रतिनिधी बैठकीला गैरहजर होते. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढली.यामुळे “प्रश्न सोडवण्याची जबाबदारी कोणाची?” असा सवाल उपस्थित झाला.
मोर्च्याचा इशारा
पाणीप्रश्नावर आता आक्रमक भूमिका घेण्याची तयारी सुरू आहे. १ किंवा २ मे रोजी मोर्चा काढण्याचे नियोजन आहे.
हा मोर्चा प्रशासनाला जाग आणण्यासाठी असल्याचे फेडरेशनचे म्हणणे आहे. यावेळी प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांकडून ठोस उत्तर मिळाले नाही. पाणी प्रश्नावरून दीर्घकाळानंतर सभा झाली. तरीही तोडगा निघाला नाही. यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
पिंपरी-चिंचवडमधील पाणीप्रश्न आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. नागरिकांचा संयम सुटताना दिसत आहे. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
मुख्य मागण्या स्पष्ट
– सोसायट्यांना नियमित पाणीपुरवठा करावा.
– दीर्घकालीन उपाययोजना जाहीर कराव्यात.
– प्रश्न सोडवण्यासाठी वेळापत्रक निश्चित करावे.
बैठकीतील ठळक घडामोडी
– पाणीप्रश्नावर नागरिकांचा संताप
– जनसंवाद सभेत तणाव
– मोर्च्याची तयारी सुरू
– लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीवर नाराजी
रहाटणी ः सोसायट्यांना होणा-या अपु-या पाणी प्रश्नावर ड क्षेत्रीय कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
