पिंपरी–चिंचवड
पवना धरणातून बुधवारी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. या विसर्गामुळे रावेत परिसरातील पाणीपातळीत बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पवना उपविभागाच्या सूचनेनुसार सकाळपासून सिंचन विमोचकाद्वारे ४०० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा आणि सिंचन नियोजनासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
रावेत येथील जलउपसा केंद्राजवळ पाणीपातळी संतुलित ठेवण्यासाठी दुपारी २ वाजता जलविद्युत केंद्रातून अतिरिक्त पाणी सोडण्यात येणार आहे. सुमारे १००० क्युसेक क्षमतेने ८ McFt पाणी नदीपात्रात सोडण्याचे नियोजन आहे.
या दुहेरी विसर्गामुळे नदीपात्रातील पाणीपातळी अचानक वाढू किंवा कमी होऊ शकते. रावेत बंधारा आणि आसपासच्या भागात विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नदीकाठच्या नागरिकांनी, शेतकऱ्यांनी आणि स्थानिक यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. नदीपात्रात अनावश्यक वावर टाळावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
