दक्षिण कोकणात मान्सून दाखल; १५ जूनपर्यंत पावसाचा जोर कमी राहणार, शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला

मुंबई

दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन झाले असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागांत ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र, त्यानंतर राज्यातील पावसाचा जोर आणि मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. किमान १५ जूनपर्यंत राज्यभर व्यापक स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीबाबत घाईगडबड करू नये, असे आवाहन कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह वादळी पावसाच्या सरी कोसळू शकतात. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्याचीही शक्यता आहे. मात्र हा पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा असणार असून खरीप हंगामातील पेरणीसाठी आवश्यक असलेल्या व्यापक आणि सातत्यपूर्ण पावसाची स्थिती अद्याप निर्माण झालेली नाही.

दरम्यान, राज्यातील उष्णतेचा प्रभावही कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. किमान १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याच्या पातळीवरच राहण्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि खानदेशातील काही भागांत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता असून मराठवाड्यात ते ३५ ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान राहू शकते.

या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. केवळ एखाद्या-दोन वादळी सरींवर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये, कारण पुढील काही दिवस पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. पुरेसा आणि सातत्यपूर्ण पाऊस झाल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे विभागाने म्हटले आहे.

तसेच नागरिकांना विजांच्या कडकडाटाच्या वेळी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वादळी पावसादरम्यान झाडाखाली, टिनशेडखाली किंवा विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दक्षिण कोकणात मान्सून दाखल झाल्याने राज्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असल्या तरी पुढील आठवडाभर मान्सूनची वाटचाल संथ राहण्याची शक्यता असल्याने सर्वांचे लक्ष आता १५ जूननंतरच्या हवामानस्थितीकडे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *